नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकार लवकरच आरोग्य विभागात मोठी पदभरती करण्याच्या तयारीत असून, त्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
२४ जून रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील विविध आरोग्य संस्थांसाठी तब्बल ५ हजार २२३ नव्या पदांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या नव्या पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अधिपरिचारिका, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, शिपाई, सफाईगार, पहारेकरी, कार्यालयीन अधीक्षक तसेच इतर अनेक पदांचा समावेश आहे.

राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या आणि श्रेणीवर्धित करण्यात येणाऱ्या एकूण २५९ रुग्णसंस्थांसाठी ही पदनिर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, बीड, अकोला, मंचर, इचलकरंजी, नाशिक यांसारख्या जिल्हा आणि सामान्य रुग्णालयांचा समावेश आहे.
तसेच अनेक ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांची खाट क्षमता वाढवण्यात येत आहे. काही रुग्णालये ३० खाटांवरून ५० खाटांपर्यंत, तर काही १०० खाटांच्या रुग्णालयांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. हिंगोली आणि नाशिक येथे नव्या स्त्री रुग्णालयांसाठीही पदनिर्मिती करण्यात आली आहे.
याशिवाय ट्रॉमा केअर युनिट, आयुष रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आदिवासी आरोग्य केंद्रे आणि राज्यस्तरीय प्रशिक्षण व औषधी भांडार संस्थांमध्येही मोठ्या प्रमाणावर पदे निर्माण करण्यात आली आहेत.

दरम्यान, या ५२२३ पदांच्या निर्मितीला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याने आता भरती प्रक्रियेबाबतची पुढील कार्यवाही लवकरच सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत जाहिरातींकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

