पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड झाली आहे. विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले असून आता त्याला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप, याचा अंतिम निर्णय 29 जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
न्यायालयीन कामकाज सुरू होताच न्यायाधीशांनी आरोपीची ओळख निश्चित केली आणि त्याच्यावर ठेवण्यात आलेले सर्व गंभीर आरोप सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता फाशी किंवा आजन्म कारावास अशी शिक्षा होऊ शकते, असेही न्यायालयाने नमूद केले.

सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीला घटनेबाबत विचारणा केली. मात्र आरोपी घटनेचे वर्णन करू लागल्यानंतर न्यायालयाने त्याला थांबवत, “आता फक्त शिक्षेबाबत बोलायचे,” असे स्पष्ट शब्दांत सुनावले. शिक्षेबाबत विचारणा होताच आरोपी निशब्द झाल्याचे कोर्टात पाहायला मिळाले.
सरकारी पक्षाने युक्तिवाद करताना या गुन्ह्याची भीषणता अधोरेखित केली. शवविच्छेदन अहवालानुसार चिमुरडीच्या शरीरावर १८ जखमा आढळल्या होत्या. आरोपीने गुन्ह्यापूर्वी परिसराची पाहणी केल्याचा तसेच यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचा मुद्दा सरकारी वकिलांनी मांडला. आरोपीला कोणताही पश्चाताप नसल्याने त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावर निरीक्षण नोंदवताना न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत क्रूर, घृणास्पद आणि अमानवीय असल्याचे म्हटले. आरोपी यापूर्वीही दोन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरला असल्याची नोंद न्यायालयाने घेतली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे. या प्रकरणात भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली जाणार की जन्मठेप, याचा निकाल लवकरच स्पष्ट होणार आहे.

