महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चाललाय. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. सध्या राज्यावर असलेल्या प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीमुळे आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण भागात उष्ण आणि दमट हवामान तयार झालं आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात नागरिकांना प्रचंड उकाडा आणि घामट वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबईमध्येही तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. सांताक्रूझ येथे ३६ अंश तर कुलाबा येथे ३४.६ अंश तापमान नोंदलं गेलं. विशेष म्हणजे सकाळच्या वेळीसुद्धा आर्द्रता जास्त असल्याने लोकांना अस्वस्थता जाणवत आहे.
दुसरीकडे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र होताना दिसतेय. सोलापूरमध्ये तापमान ४३.२ अंशांवर पोहोचलं, तर पुण्यात ३९.९ अंशांची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.४ आणि परभणीत ४२.१ अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे.
विदर्भात तर परिस्थिती आणखी गंभीर आहे. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४ अंश तापमान नोंदलं गेलं आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या भागांमध्येही तापमान ४२ ते ४३ अंशांच्या दरम्यान आहे.
हवामान विभागानुसार, पुढील दोन ते चार दिवस कोकणात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार आहे. तर सांगली, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळा, भरपूर पाणी प्या आणि स्वतःला थंड ठेवा. कारण येणारे काही दिवस राज्यासाठी अक्षरशः ‘हिट वेव्ह’ टेस्ट ठरणार आहेत.
