महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील एकूण १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, त्यापैकी ६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित ११ जागांवर चुरशीची लढत होत आहे. या निवडणुकीकडे केवळ स्थानिक राजकारण म्हणून नव्हे, तर महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय ताकदीची परीक्षा म्हणूनही पाहिले जात आहे. विशेषतः शिवसेना उबाठा पक्षातील काही नेत्यांच्या पक्षांतरानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा मतदानावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांनी आपल्या सदस्यांना व्हिप जारी केला आहे. अधिकृत उमेदवाराशिवाय इतर कोणालाही मतदान केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या निवडणुकीत महापालिकेतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर-जालना यांसारख्या मतदारसंघांमध्ये थेट लढती होत आहेत.
दरम्यान, ठाणे, पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांतील उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीचा निकाल २२ जून रोजी जाहीर होणार असून, त्यातून आगामी राजकीय समीकरणांची दिशा स्पष्ट होणार असल्याचे चित्र आहे.

