महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं नुकतंच निधन झालं. भोर-मुळशी-वेल्हा मतदारसंघावर अनेक दशकं प्रभाव टाकणाऱ्या या नेत्याने सामान्य शेतकरी कुटुंबातून सुरू केलेला प्रवास राज्याच्या राजकारणातील सर्वोच्च पदांच्या चर्चेपर्यंत पोहोचला होता.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. त्यावेळी दोन्ही बाजूंचे नेते एका नव्वदीपार ज्येष्ठ नेत्याच्या घरी जाऊन पाठिंबा मागत होते. तो नेता म्हणजे अनंतराव थोपटे. राजकारणातून जवळपास निवृत्त झाल्यानंतरही त्यांचं वजन आणि प्रभाव कायम असल्याचं हे उदाहरण मानलं जातं.
1933 मध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हातनोशी या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि पुढे पदवी शिक्षण पूर्ण केलं. मात्र त्यांची ओळख केवळ विद्यार्थी म्हणून नव्हती. ते एक उत्कृष्ट कुस्तीपटू होते. पुणे विद्यापीठाच्या कुस्ती संघाचे कर्णधार म्हणून त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं मिळवून दिली होती.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सरकारी सेवेत प्रवेश केला. सहकार अधिकारी, गटविकास अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं. मात्र समाजकारणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली. विशेष म्हणजे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 1972 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक जिंकून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
नंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि पुढे राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची भूमिका बजावली. वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार आणि सुधाकरराव नाईक अशा पाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम केलं. दुग्धविकास, कृषी, शिक्षण, परिवहन, पुनर्वसन अशा तब्बल 11 खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
दुग्धविकास मंत्री असताना त्यांनी ‘महानंद’ची स्थापना केली आणि महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाला नवी दिशा दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात दूध उत्पादन वाढलं आणि अनेक शेतकऱ्यांना शेतीला पूरक उत्पन्नाचा स्रोत मिळाला. त्याचप्रमाणे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम इतके प्रभावी ठरले की त्याला पुढे ‘थोपटे पॅटर्न’ म्हणून ओळख मिळाली.
भोर-मुळशी-वेल्हा मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांचं आणि मतदारसंघाचं नातं अधिक घट्ट झालं. राजगड सहकारी साखर कारखान्यासारखे प्रकल्प उभे करून त्यांनी डोंगराळ भागातील विकासाला चालना दिली. त्यामुळे ‘भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजे भोर’ असं समीकरण तयार झालं.
1999 मध्ये त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य दावेदारांमध्ये घेतलं जात होतं. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. तरीही त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष बदलला, पण थोपटे अखेरपर्यंत काँग्रेससोबत राहिले.
आजच्या पक्षांतरांच्या आणि राजकीय गणितांच्या युगात अनंतराव थोपटे यांची ओळख निष्ठावंत, संयमी आणि विकासाभिमुख नेता अशीच राहिली. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर केवळ भोर किंवा पुणे जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.

