
ग्रामीण भागातील LPG ग्राहकांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ग्रामीण भागात दोन LPG सिलेंडर बुकिंगमधील 45 दिवसांची अट आता कमी करून 25 दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण ग्राहकांनाही 25 दिवसांनंतर पुन्हा सिलेंडर बुक करता येणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी याबाबत माहिती दिली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने 7 सप्टेंबर रोजी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या प्रमुखांना पत्र पाठवून ग्रामीण भागातील रिफील बुकिंगचा कालावधी 25 दिवस करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
LPG पुरवठा सुधारल्याने निर्णय
अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर LPGच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. मागणी आणि पुरवठ्यात समतोल राखण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी 45 दिवसांची बुकिंग अट लागू करण्यात आली होती. मात्र, आता LPGचा पुरवठा वाढला असून रिफीलचा अनुशेषही कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने हा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एखाद्या ग्रामीण ग्राहकाने 1 तारखेला सिलेंडर बुक केला असेल, तर 26 तारखेपासून पुन्हा सिलेंडर बुक करता येणार आहे. म्हणजेच ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांसाठी बुकिंगचा कालावधी आता समान झाला आहे.
दरम्यान, LPGला पर्याय म्हणून केंद्र सरकारकडून PNG कनेक्शन वाढवण्यावरही भर दिला जात आहे. काही शहरांमध्ये PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांना LPG कनेक्शन सरेंडर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

