अवघ्या काही दिवसांपूर्वी शांततेचा करार आणि आता पुन्हा हल्ले. मग इराण आणि अमेरिका पुन्हा आमनेसामने का आले?
सुमारे चार महिन्यांच्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये १७ जून रोजी एक प्राथमिक शांतता करार झाला होता. त्यानुसार होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित वाहतूक, इराणला आर्थिक मदत आणि अणु कार्यक्रमावर चर्चा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाली होती. पुढील ६० दिवसांत अंतिम करार होणार होता.

मात्र, ६ जुलैला इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन व्यापारी जहाजांवर हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेने इराणमधील ८० हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला. यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांना इशारे दिले आणि तणाव पुन्हा वाढला.
तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण कोणाचं राहणार, यावरूनच मुख्य वाद सुरू झाला. इराणला या मार्गावर अधिक नियंत्रण हवं होतं, तर अमेरिका या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर कोणत्याही एका देशाचा ताबा असू नये, या भूमिकेवर ठाम आहे.

याशिवाय, इराणला मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबतही नाराजी होती, तसेच अमेरिकेने इतर मध्यपूर्व देशांबरोबर केलेल्या हालचालींकडेही इराण संशयाने पाहत होता.
आता प्रश्न असा आहे की, युद्ध पुन्हा सुरू झालंय का? तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सध्या दोन्ही देश एकमेकांवर मर्यादित हल्ले करत आहेत. म्हणजे पूर्ण युद्ध सुरू झालेलं नाही. पण जर तणाव असाच वाढत राहिला, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.
दुसरीकडे, पुन्हा चर्चेची शक्यताही पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत हा वाद आणखी वाढतो की दोन्ही देश पुन्हा चर्चेच्या येतात, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

