महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेली विश्रांती आता संपण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस मुंबईसह कोकण, विदर्भ, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील सुमारे 27 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार सरी आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यताही आहे.

पावसासाठी वातावरण कसं तयार झालं?
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. हे क्षेत्र पुढील काळात वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर भारतापासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा आणि हवेच्या जोडक्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम विशेषतः कोकण, विदर्भ, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा आणि सांगली या भागांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे.
27 जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
मुंबईसह संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील पाच दिवस पावसाचा सामना करावा लागू शकतो. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, गोंदिया यांसह अन्य जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तर मराठवाड्यातील आणि अहिल्यानगर, सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये तुलनेने हलका किंवा तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबईत ऑगस्टची सरासरी आताच पार
मुंबईत यंदाच्या मान्सूनने चांगली कामगिरी केली आहे. कुलाबा येथे 13 ऑगस्टच्या सकाळपर्यंत 1,725.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ऑगस्टअखेरपर्यंत कुलाब्यात सरासरी 1,716.8 मिलिमीटर पाऊस पडतो. म्हणजेच ऑगस्ट महिना पूर्ण होण्यापूर्वीच कुलाब्याने महिन्याची सरासरी ओलांडली आहे. सांताक्रूझमध्येही 1 जूनपासून आतापर्यंत सुमारे 2,100 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सप्टेंबरअखेरची सरासरी गाठण्यासाठी आता आणखी सुमारे 104 मिलिमीटर पावसाची गरज आहे. आगामी दोन आठवड्यांत कोकण किनारपट्टीवर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने सांताक्रूझची ही तूटही भरून निघण्याची शक्यता आहे.
पुण्यात जोरदार पाऊस की रिमझिम?
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी अशी स्थिती आहे. मात्र, पुढील तीन दिवस पुणे शहरासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. घाटमाथ्यावर मात्र जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गुरुवारी पुण्यात दिवसभरात 1.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहराचं कमाल तापमान 28.4 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22.1 अंश सेल्सिअस होतं.
विदर्भातही पावसाचा जोर वाढणार
कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम विदर्भावरही होण्याची शक्यता आहे. अमरावती, नागपूर आणि गोंदिया परिसरात वातावरणातील वाऱ्यांच्या स्थितीमुळे पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील काही भागांत जोरदार सरींसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
जळगावमध्ये चार दिवस पावसाची शक्यता
जळगाव जिल्ह्यातही 14 ते 18 ऑगस्टदरम्यान पावसाची शक्यता आहे. 14 ऑगस्टला मध्यम पाऊस, 15 ऑगस्टला काहीशी उघडीप आणि त्यानंतर 16 आणि 17 ऑगस्टला पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची मोठी तफावत
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात पावसाचं चित्र अत्यंत लहरी राहिलं आहे. 12 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत तब्बल 21 दिवस कोरडे गेले, तर आठ दिवस 5 मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला. केवळ दोन दिवस 10 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. 12 जुलैला मोसमातील एकूण पाऊस 267.5 मिलिमीटर होता. 12 ऑगस्टपर्यंत हा आकडा 361.4 मिलिमीटरवर पोहोचला. म्हणजे महिनाभरात फक्त 93.9 मिलिमीटर पावसाची भर पडली. यातील बहुतांश पाऊस 31 जुलै आणि 1 ऑगस्ट या दोन दिवसांतच झाला.
पुढचे 24 तास महत्त्वाचे
राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्याची शक्यता असल्याने पुढील 24 तास महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेषतः घाटमाथा, नदी-नाले आणि पूरप्रवण भागातील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. हवामान विभागाच्या सूचना लक्षात घेऊन अनावश्यक प्रवास टाळावा आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. एकूणच, गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. मुंबईने पावसाची सरासरी ओलांडली असली, तरी राज्यातील अनेक भाग अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस महाराष्ट्रासाठी पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.

