
महाराष्ट्राच्या नवीन शैक्षणिक आराखड्यानुसार तयार करण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘लोकनृत्य’ या धड्यात महाराष्ट्रातील अनेक पारंपरिक लोकनृत्यांचा उल्लेख नसल्याने शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वादाच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्ध लोकनृत्य परंपरेपैकी केवळ दिंडी नृत्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र गुजरात, पंजाब, छत्तीसगड आणि बिहारसारख्या राज्यांतील लोकनृत्यांना सविस्तर माहिती आणि रंगीत चित्रांसह स्थान देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या राज्याच्या सांस्कृतिक वारशाची पुरेशी ओळख करून दिली जात नसल्याचा आरोप होत आहे.
टीकाकारांच्या मते, महाराष्ट्राची ओळख असलेल्या लेझीम, लावणी, गोंधळ, कोळी नृत्य, झिम्मा-फुगडी आणि पोवाडा यांसारख्या लोकनृत्यांचा धड्यात उल्लेख नसणे आश्चर्यकारक आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे-पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच हा निर्णय नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने घेतला, याचाही खुलासा व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, लोकसाहित्य अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या साहित्याच्या आधारे हा धडा तयार करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी मूळ मजकुरातील काही भाग वगळून त्यात बदल करण्यात आल्याचा आरोपही समोर आला आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.
या वादावर प्रतिक्रिया देताना बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विद्यार्थ्यांना देशातील विविध राज्यांच्या लोकनृत्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने धड्याची रचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व म्हणून दिंडी नृत्याचा समावेश करण्यात आला असून इतर स्थानिक लोकनृत्यांची माहिती शिक्षकांनी वर्गात द्यावी, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र या स्पष्टीकरणानंतरही वाद शमलेला नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला अभ्यासक्रमात पुरेसे स्थान मिळाले आहे का, हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.

