भारताने श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची टेस्ट सिरीज 1-0 अशी जिंकली असली, तरी कोलंबो कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतरसुद्धा सामना जिंकता आला नाही. त्यामुळे मालिकेत क्लीन स्वीप करण्याची संधी तर भारताच्या हातातून निसटलीच, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही त्याचा मोठा परिणाम झाला.

कोलंबो टेस्ट मध्ये भारताने पहिल्या इनींग मध्ये 503 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव फक्त 290 धावांत संपवत भारताने त्यांना फॉलोऑन दिला. त्यामुळे भारत सहज मॅच जिंकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण श्रीलंकेच्या दुसऱ्या इनींग मध्ये सोनल दिनुशाने केलेल्या नाबाद 133 रन्सच्या शानदार खेळीने भारताच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरलं. शेवटी मॅच ड्रॉ झाली आणि दोन्ही टीम्सना प्रत्येकी 4 पॉईंट्स मिळाले.

या निकालामुळे भारताच्या WTC पॉइंट्स पर्सेंटेजवरही परिणाम झाला आहे. भारताची टक्केवारी 53.33 वरून 51.51 पर्यंत खाली आली असून टीम इंडिया पाचव्या स्थानावर कायम आहे. भारताने हि मॅच जिंकली असती, तर 12 पॉईंट्स मिळाले असते आणि पॉइंट्स पर्सेंटेज 63.33 पर्यंत पोहोचली असती. त्यामुळे भारताला पॉईंट्स टेबल मध्ये चौथ्या जागेवर जाण्याची संधी होती.

सध्या ऑस्ट्रेलिया 80 पॉइंट्स पर्सेंटेजसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिका 75 टक्क्यांसोबत दुसऱ्या नंबरवर असून न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी WTC फायनलची शर्यत आता अजून आव्हानात्मक झाली आहे. भारताकडे या WTC सायकलमध्ये अजून 7 कसोटी सामने शिल्लक आहेत. न्यूझीलंडविरुद्ध 2 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामने भारताला खेळायचे आहेत. फायनलमध्ये स्थान मिळवायचं असेल, तर या सामन्यांमध्ये भारताला सातत्याने जिंकणं गरजेचं असेल. एका पराभवामुळे किंवा ड्रॉमुळेही इक्वेशन्स बिघडू शकतात.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धची सिरीज भारतासाठी कोच गौतम गंभीरच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने पहिल्यांदाच परदेशात कसोटी मालिका जिंकली. गॉलमध्ये भारताने 165 धावांनी विजय मिळवला होता. पण कोलंबोमध्ये विजय हातातून निसटल्याने क्लीन स्वीपचं स्वप्न अधुरं राहिलं. आता भारताचं लक्ष व्हाइट-बॉल क्रिकेटकडे असेल. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून WTC फायनलच्या शर्यतीतील खरी परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे उर्वरित 7 कसोटी सामने भारतासाठी प्रत्येक अर्थाने निर्णायक ठरणार आहेत.

