महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे.

राज्यातील तब्बल 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, 64 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
मंडळाने सुरुवातीला दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल, असे सांगितले होते. मात्र वेबसाइटवरील वाढता ट्रॅफिक आणि विद्यार्थ्यांची उत्सुकता लक्षात घेता निकाल सकाळी 11:30 वाजल्यापासूनच उपलब्ध करून देण्यात आला.
यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेला पुरेसा वेळ मिळावा म्हणून बोर्डाने परीक्षा 10 दिवस आधी घेतली होती. राज्यभरात परीक्षा शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
निकालात मुलींचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले आहे. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का 94.96 इतका राहिला असून मुलांचा निकाल 89.56 टक्के लागला आहे. म्हणजेच मुली मुलांपेक्षा 5.40 टक्क्यांनी पुढे राहिल्या आहेत.
विभागनिहाय निकालात कोकण विभागाने 97.62 टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41 टक्के लागला आहे.
असा आहे विभागानुसार निकाल

कोकण: 97.62 टक्के
कोल्हापूर: 95.47 टक्के
मुंबई: 94.97 टक्के
पुणे: 94.24 टक्के
नाशिक: 90.53 टक्के
अमरावती: 90.50 टक्के
नागपूर: 89.07 टक्के
लातूर: 88.42 टक्के
छत्रपती संभाजीनगर: 88.41 टक्के
आता या निकालानंतर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.