
काही माणसं या जगातून निघून जातात, पण त्यांच्या जाण्याने फक्त एक व्यक्ती हरवत नाही तर एक आवाज शांत होतो, एक आधार हरवतो, एक नेतृत्व हरवतं आणि हजारो-लाख्खो माणसांच्या मनात एक अशी पोकळी निर्माण होते जी कधीच भरून निघत नाही. आज अजितदादांची पहिली जयंती.. पण खरं सांगायचं तर आज ‘जयंती’ हा शब्दही मनाला चटका लावून जातोय. कारण ज्या माणसाचा वाढदिवस आपण उत्साहाने साजरा करायचो, त्याच माणसाला आज आठवणींमध्ये शोधावं लागतंय. बारामतीच्या मातीतून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन पोहोचला. पुढे सहकार क्षेत्रातून सार्वजनिक जीवनात प्रवेश, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी, लोकसभेपासून महाराष्ट्र विधानसभेपर्यंतचा प्रवास, राज्यमंत्री म्हणून कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा खात्याची जबाबदारी, जलसंपदा खात्याचे मंत्री म्हणून काम आणि पुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून तब्बल सहा वेळा राज्याची धुरा सांभाळण्याचा मान.. अजितदादा म्हणजे केवळ पदांची यादी नव्हती, तर प्रत्येक पदामागे कामाची एक वेगळी कहाणी होती. अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला, जलसंपदा मंत्री म्हणून सिंचनाच्या प्रश्नांवर काम केलं, पुण्याचे पालकमंत्री म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासाशी त्यांचं नातं अधिक घट्ट झालं.

रस्ते असोत, पाणी असो, मेट्रो असो, शहरांचा विकास असो किंवा बारामतीच्या सर्वांगीण प्रगतीचा प्रश्न असो दादांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. वेळेची वाट न पाहता पहाटेपासून कामाला लागणारा नेता, अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पोहोचणारा नेता आणि निर्णय घेतल्यानंतर तो पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करणारा नेता.. म्हणूनच कदाचित अजितदादा नावामागे ‘दादा’ ही हाक फक्त राजकारणातली नव्हती, ती एका आपलेपणाची होती. राजकारणात मतभेद झाले, आरोप झाले, वाद झाले, निर्णयांवर प्रश्नही उपस्थित झाले. पण काळाच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर एक गोष्ट नाकारता येणार नाही, अजित पवार नावाचा एक नेता महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली वेगळी छाप सोडून गेला. आज ते आपल्यात नाहीत, पण बारामतीच्या रस्त्यांवरून जाताना, पुण्याच्या विकासकामांकडे पाहताना, सभागृहात त्यांची जागा पाहताना आणि ‘दादा’ म्हणून त्यांना हाक मारणाऱ्या कार्यकर्त्यांचे डोळे पाहताना एकच जाणवतं की माणूस जातो, पण त्याने उभं केलेलं काम राहतं. आवाज शांत होतो पण शब्द कायम ऐकू येत राहतात. शरीर निघून जातं पण आठवणी कधीच जात नाहीत. प्रवास संपतो पण पाऊलखुणा कायम राहतात आणि या पाऊलखुणा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या पानांमध्ये कायम जिवंत राहतील.

मा. अजितदादा आज तुम्ही नाही.. पण बारामतीच्या मातीत तुमच्या आठवणी आहेत, पुण्याच्या विकासकामांमध्ये तुमच्या निर्णयांची छाप आहे, तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनात तुमच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं ‘दादा’ म्हणून तुम्हाला हाक मारणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आजही तुम्ही तितकेच जिवंत आहात. कदाचित म्हणूनच तुमची आठवण आली की डोळे पाणावतात, तुमच्याबद्दल बोलताना शब्द कमी पडतात आणि तुमचा फोटो पाहिला की मनात एकच विचार येतो ‘दादा.. तुम्ही खरंच एवढ्या लवकर जायला नको होतं.’ कारण काही माणसं गेल्यानंतर त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि काही नावं काळाच्या ओघात कधीच मिटत नाहीत. आज तुमची पहिली जयंती.. तुम्ही असता तर कदाचित हा दिवस वेगळा असता.पण आज तुमच्या आठवणींसोबत हा दिवस साजरा करावा लागतोय. तुमचा प्रवास मोठा होता. तुमची कारकीर्द वादळी होती, पण तुमची अनुपस्थिती त्याहून मोठी आहे. तुम्ही आज आमच्यात नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या मनात तुम्ही कायम जिवंत राहाल. अजितदादा..तुम्हाला मनापासून अभिवादन!

वाढदिवसाच्या.. नाही..पहिल्या जयंतीनिमित्त..मनःपूर्वक आदरांजली🙏
तुमची आठवण.. आजही मनाला भिडते आणि कायम भिडत राहील.

