
Janmashtami Katha : जन्माष्टमीचा सण दरवर्षी श्रावणात कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत धरतीवर येतात त्यानुसारच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्माष्टमीचा दिवस आनंदात, उत्साहात साजरा करत, बालकृष्णाची खास पूजा उपासना केली जाते. द्वापर युगात श्रावण कृष्ण अष्टमीला भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला होता. त्यांचा जन्म बुधवारी रोहिणी नक्षत्रात झाला होता. चंद्रवंशात जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णांनी बुधवारचा दिवस निवडला होता, कारण बुध हा चंद्राचा पुत्र आहे. जन्माष्टमीला श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक लोक व्रत करतात. या दिवशी श्रीकृष्णाची कथा ऐकली जाते.
पौराणिक कथेनुसार, कंसाने वडील राजा उग्रसेन यांच्याकडून सिंहासन हिरावून घेत होते. वडिलांना तुरुंगात बंद करून त्याने स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले. कंसाने जेव्हा त्याची बहीण देवकीचा विवाह वसुदेव यांच्याशी लावून दिला, त्यावेळी एक आकाशवाणी झाली, त्यानुसार देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल अशी ती आकाशवाणी होती. आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि त्याने देवकी- वासुदेव यांनाही कारागृहात टाकले.
कारागृहातच देवकी आणि वासुदेव यांना 7 संतती झाल्या, त्यांना कंसाने मारून टाकले. देवकीच्या आठव्या संततीचा जन्म श्रावण महिन्यामधील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्रीच्या झाला. त्यावेळी चंद्र वृषभ राशीत, नक्षत्र रोहिणी आणि वार बुधवार होता. जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला, तेव्हा तुरुंगातील सर्व कुलपे आपोआप तुटली आणि तिथे पहारा देत असलेले सर्व सैनिक गाढ झोपी गेले. भगवान विष्णूंनी आधीच वासुदेव- देवकीला सांगितले होते, ‘ते देवकीच्या गर्भातून जन्म घेतील. त्यांना गोकुळात नंद बाबांकडे सोडून यावे आणि त्यांच्या घरी जन्मलेल्या कन्येला मथुरेत आणून कंसाच्या स्वाधीन करावे.’
वासुदेवाने अगदी तसेच केले. त्यावेळी यमुना नदीला पूर आला होता, परंतु जेव्हा वासुदेव बाळकृष्णाला टोपलीत घालून यमुना नदी पार करण्यासाठी उतरले, तेव्हा शेषनागाने आपल्या फण्याने त्यांचे पावसापासून संरक्षण केले. जेव्हा बाळाच्या पायांनी युमनेच्या पाण्याला स्पर्श केला नदीचा पूर ओसरला आणि पाणी स्थिर झाले. यमुना नदी पार करून वासुदेव गोकुळात पोहोचले आणि नंदांच्या घरात प्रवेश करून त्यांनी आपला पुत्र त्यांना दिला आणि त्याऐवजी त्यांची कन्या घेतली.

वासुदेव ताबडतोब तेथून कंसाच्या कारागृहात परत पोहोचले. सकाळ होताच कंसाने देवकीच्या कुशीतून कन्येला हिसकावून घेतले आणि तिला एका दगडी शिळेवर आपटणार तेव्हाच ती कन्या विष्णूच्या मायेने आकाशाच्या दिशेने निघून गेली. तिने कंसाला सांगितले की, ‘हे दुष्टा! तुझा वध करणारा गोकुळात नंदांच्या घरात जन्माला आलाय आणि त्याच्याकडून तुझा मृत्यू निश्चित आहे. माझे नाव तर वैष्णवी आहे, मी संसाराचे कर्ते भगवान विष्णू यांच्या मायेपासून उत्पन्न झाली आहे, असे सांगून ती स्वर्गाच्या दिशेने निघून गेली. इकडे नंद आणि यशोदाने श्रीकृष्णाचे पालनपोषण केले. कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी अनेक मायावी राक्षस गोकुळात पाठवले पण श्रीकृष्णाने सर्व राक्षसांचा संहार केला. कालिया नागाने यमुना नदी दूषित केले होती. कृष्णाने कालिया नागासोबत युद्ध करून त्याचा पराभव केला आणि गोकुळवासियांची सुटका केली. श्रीकृष्णाची ही यशोकिर्ती कंसापर्यंत पोहोचली आणि तो अधिकच बेचैन झाला. श्रीकृष्ण आणि त्याचा भाऊ बलराम यांचा पराभव कसा करावे हेच कंसाल समज नव्हते.
मथुरचे दक्षिण भागात कंसाचा महातेजस्वी मंत्री चाणूर राहत होता. कंसाने त्याला बोलावून घेतले. तेव्हा चाणूरने कंसाला सल्ला दिला की, त्या दोघांना मथुरेत बोलावून त्यांच्याशी मल्लयुद्ध करून त्यांचा वध करावा. कंसाला चाणूरचा सल्ला आवडला. त्याने अक्रूरजींना बोलावून दोन्ही बालकांना आणण्यासाठी पाठवले. अक्रूरजी नंदजींकडे गेले आणि त्यांनी कंसाचा हेतू त्यांना सांगितला. हे ऐकून नंदजी आणि यशोदा माता भयभीत झाले आणि त्यांनी अक्रूरजींना नकार दिला. मात्र, श्रीकृष्णांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी त्यांना समजावून सांगितले आणि ते बलरामासोबत मथुरेला जाण्यासाठी ते तयार झाले.
मथुरा नगरीत पोहोचल्यानंतर श्रीकृष्णाने मालिनचे कुबड ठीक केले आणि पिसाळलेल्या हत्तीचा वध केला. कंसाच्या उत्सवात त्यांनी शिव शंकराचे धनुष्य तोडून टाकले. त्यानंतर आखाड्यात प्रथम चाणूराचा आणि मग केशीचा वध केला. कंसाने मोठमोठ्या दैत्यांना बोलावून त्यांना श्रीकृष्ण आणि बलराम यांचा पराभव करण्यास सांगितले. मात्र, त्या सर्व दैत्यांचा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी वध केला. बलरामाने मुसळ आणि नांगराच्या साहाय्याने, तर श्रीकृष्णांनी चक्राने अनेक दैत्यांचा संहार केला.
यानंतर श्रीकृष्णाने कंसाला पकडून म्हटले, “हे दैत्या, मीच देवकीचा आठवा पुत्र आहे, ज्याच्यामुळे तुला मृत्यू प्राप्त होणार आहे. मी तुझा वध करून या संसाराला तुझ्या पापांपासून मुक्त करेन.” असे म्हणत श्रीकृष्णाने कंसाला जमिनीवर आपटले आणि त्याच्या छातीवर स्वार झाले. त्यानंतर कंसाचे केस पकडून त्याच्या छातीवर मुष्टिप्रहार केला आणि त्याचे प्राण घेतले. कंसाचा सर्वनाश होताच सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली तर मथुरावासियांनी श्रीकृष्णाला वंदना केले. त्यानंतर श्रीकृष्णांनी वसुदेव, देवकी आणि अग्रसेनाची कारागृहातून मुक्त केले. अशी ही जन्माष्टमीची कथा तुम्ही नक्की वाचा किंवा ऐका. शास्त्रांनुसार, जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांना यशोकिर्ती, सुख समृद्धी मिळते. सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग घेऊन शेवटी मोक्ष प्राप्त होतो.

