छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज MIDC परिसरातल्या तिसगावजवळ असलेल्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला. एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचाही जीव गेला. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आणि यामागचं कारण काय? तर एक आयफोन…!!!

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल चांदवडे हा १९ वर्षीय तरुण घरातील वादानंतर खवड्या डोंगरावर गेला होता. महागडा आयफोन घेण्यावरून त्याचा आई-वडिलांशी वाद झाल्याचं समोर आलं आहे. या वादानंतर तो डोंगराच्या कड्यावर जाऊन उभा राहिला. त्याला समजावून सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे घटनास्थळी पोहोचले. कुणालला खाली आणण्यासाठी जवळपास तीन तास प्रयत्न सुरू होते. त्याचे आई-वडील, स्थानिक ग्रामस्थ तसेच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याच्याशी संवाद साधत त्याला परत येण्याची विनंती केली. परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याने बचाव पथकाकडूनही त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. खाली सुरक्षा जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
यादरम्यान कुणाल कड्याजवळ वारंवार आपली जागा बदलत असल्यामुळे बचावकार्य आणखी कठीण होत गेले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनीही त्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्याला मोबाईल देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचेही समोर आले आहे. मात्र अनेक प्रयत्न करूनही परिस्थिती नियंत्रणात आली नाही. अखेर कुणाल कड्यावरून खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी पुढे गेलेल्या त्याच्या वडिलांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. आपल्या मुलाला आणि पतीला खाली पडताना पाहिल्यानंतर आई संगीता यांनीही उडी घेतल्यामुळे त्यांचाही दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे. काही क्षणांतच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. या घटनेमुळे तिसगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पालक आणि मुलांमधील संवादाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. एखाद्या वस्तूवरून झालेला वाद, क्षणिक राग किंवा भावनिक तणाव किती गंभीर वळण घेऊ शकतो, हे या घटनेतून दिसून येते. मात्र या घटनेमागील नेमकी कारणे आणि तरुणाची मानसिक अवस्था याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्ट माहिती समोर येणे महत्त्वाचे आहे.
ही घटना फक्त एका कुटुंबाची शोकांतिका नाहीये, तर संकटाच्या वेळी अशा धोकादायक ठिकाणी बचावकार्य किती आव्हानात्मक असतं, याचीही जाणीव करून देणारी आहे. एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांनीही जीव गमावल्याने या घटनेने परिसरातील प्रत्येकाला चटका लावला आहे.

