
मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने आता प्रवाशांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
रिक्षाचे किमान भाडे 27 रुपये
नव्या दरानुसार रिक्षाच्या पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 26 रुपयांऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. म्हणजेच रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी लागू असलेल्या दरानुसार प्रवाशांकडून भाडे आकारले जाईल.
टॅक्सीच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ
काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या प्रवाशांनाही या दरवाढीचा फटका बसणार आहे. टॅक्सीचे किमान भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये करण्यात आले आहे. म्हणजेच टॅक्सीच्या किमान भाड्यात 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे कमी अंतराच्या प्रवासासाठीही प्रवाशांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.
मुंबईपुरतीच भाडेवाढ नाही
ही दरवाढ केवळ मुंबई शहरापुरती मर्यादित नसून मुंबई महानगर प्रदेशातील विविध भागांमध्ये लागू होणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई-विरार आणि पालघर परिसरातील रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या प्रवाशांना नव्या दरानुसार भाडे द्यावे लागणार आहे.
चालकांकडून वाढत्या खर्चाचा दाखला
रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांकडून गेल्या काही काळापासून भाडेवाढीची मागणी केली जात होती. इंधन, वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती, विमा, परवाना तसेच इतर खर्च वाढल्याने सध्याचे भाडे पुरेसे नसल्याचा दावा चालक संघटनांकडून करण्यात आला. परिवहन आयुक्तांनी 20 ऑगस्ट रोजी भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर MMRTAने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवाशांचा भाडेवाढीला विरोध
दरम्यान, या भाडेवाढीला प्रवासी हक्क कार्यकर्ते आणि काही संघटनांकडून विरोध होत आहे. आधीच महागाईमुळे घरखर्च, शिक्षण, आरोग्य आणि वाहतुकीचा खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाल्यास दररोज प्रवास करणाऱ्या सामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या खर्चात आणखी भर पडेल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा होणाऱ्या दरवाढीमुळे मुंबई महानगरातील रोजच्या प्रवाशांच्या खिशावर किती अतिरिक्त भार पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

