शेवरे दिगर येथे १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ आणि ग्रामसेवक यांच्यात झालेल्या शाब्दिक वादानंतर ग्रामसेवक पी. एन. पाटील (वय ५४) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ग्रामसभेतील वादामुळे मानसिक धक्का बसल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली असून, संशयितांवर कारवाई करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पारोळा पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, ग्रामसेवकांनी ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

शेवरे दिगर येथे १५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेत विविध मुद्द्यांवर ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर चर्चा सुरू असताना काही मुद्द्यांवरून ग्रामस्थ आणि ग्रामसेवक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे ग्रामसभेचे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. वादानंतर ग्रामसेवक पी. एन. पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते ग्रामसभेतून घरी निघाले. ते निघत असतांना तेथिल काही तरुणांनी त्यांना शिवीगाळ केला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात नेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
ग्रामसेवक संघटनेचे ठिय्या आंदोलन
पाटील यांच्या मृत्यूची माहिती मिळताच ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी पारोळा पोलिस ठाण्यात दाखल झाले. ग्रामसभेतील वादामुळेच पाटील यांना मानसिक धक्का बसून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधित संशयितांना तातडीने अटक करावी, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष नंदकुमार गोराडे आणि संघटनेने केली आहे. या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे, मानद जिल्हाध्यक्ष संजय भाईदास पाटील, जिल्हा संघटक शरद पाटील, ग्रामसेवक पतपेढीचे भाऊसाहेब पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते. पी. एन. पाटील हे पारोळा तालुक्यातील बोदर्डे येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा आणि जावई असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीयांसह ग्रामसेवकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
ग्रामसभांवर ग्रामसेवकांचा बहिष्कार
या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक संघटनेने आता ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभांमध्ये ग्रामसेवकांना धमकी, दबाव किंवा वादाला सामोरे जावे लागू नये, तसेच संबंधित प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, ग्रामसभेतील वाद आणि त्यानंतर झालेल्या पाटील यांच्या मृत्यूचा नेमका संबंध काय, याचा तपास केला जात आहे.

