महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंच्या नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू असतानाच आज सकाळी आणखी एका भेटीने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. सकाळी सुमारे 8.20 वाजता राज ठाकरे यांचा ताफा ‘वर्षा’वर पोहोचला. विशेष म्हणजे, गेल्या काही काळापासून भाजप आणि महायुतीच्या भूमिकांवर राज ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची भेट राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली.

अचानक भेट नाही, आधीच ठरली होती बैठक
राज ठाकरे यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हेही बैठकीला उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही भेट अचानक ठरलेली नव्हती. दोन दिवसांपूर्वीच या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे भेटीच्या निमित्ताने कोणतीही नवी राजकीय समीकरणं तयार झाली आहेत का, याबाबत तर्क सुरू असला तरी बैठकीचा प्राथमिक संदर्भ मुंबईतील काही महत्त्वाच्या प्रश्नांशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवाजी पार्कचा मुद्दा चर्चेत?
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील क्रीडा सुविधा आणि शिवाजी पार्क जिमखान्याशी संबंधित प्रश्न या बैठकीत मांडले जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील ऐतिहासिक मैदानाचा वापर, क्रीडा सुविधांचा विकास आणि खेळाडूंना भेडसावणाऱ्या अडचणी यावर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर MCA अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची उपस्थितीही महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचाही मुद्दा?
राज ठाकरे यांनी अलीकडेच मुंबई-गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. महामार्गाचं रखडलेलं काम आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास यावर त्यांनी यापूर्वीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत या महामार्गाच्या कामाचा मुद्दाही मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित करण्यात आला असण्याची शक्यता आहे.
मग राजकीय चर्चांना उधाण का?
बैठकीचे मुद्दे प्रामुख्याने विकासकामे आणि मुंबईशी संबंधित असल्याचं सांगितलं जात असलं, तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे या भेटीकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या या राजकीय जवळीकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला. यानंतर राज ठाकरे यांनी भाजपविरोधातील आपली भूमिका आणखी तीव्र केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही त्यांनी विविध मुद्द्यांवरून टीका केली. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर राज ठाकरे थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेल्याने या भेटीला राजकीय रंग चढणं स्वाभाविक मानलं जात आहे.
संजय राऊत म्हणाले, “यात विशेष काही नाही”
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना राज्यातील समस्या किंवा विशेषतः रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा घेऊन भेटले असतील, त्यामुळे या भेटीत विशेष असं काही नसल्याचं राऊत यांनी म्हटलं. मात्र, राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि फडणवीस यांची झालेली ही भेट पुढील राजकीय घडामोडींसाठी किती महत्त्वाची ठरते, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ही भेट विकासाच्या मुद्द्यापुरतीच मर्यादित होती की त्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांची काही चर्चा झाली, याचं उत्तर पुढील काळातच स्पष्ट होईल.

