टी-२० वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंवर आता अक्षरशः पैशांचा पाऊस पडणार आहे. भारतीय संघाने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडला अंतिम सामन्यात तब्बल ९६ धावांनी पराभूत करत तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. या दमदार विजयानंतर भारतीय संघावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच बीसीसीआयनेही मोठी घोषणा केली आहे.

बीसीसीआयने संपूर्ण भारतीय संघासाठी तब्बल १३१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. या बक्षिसामध्ये खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ आणि व्यवस्थापनाचा देखील समावेश असणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक विजयाचा आनंद आता आर्थिकदृष्ट्याही अधिक गोड झाला आहे.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडूनही विजेत्या संघासाठी पारितोषिकाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीकडून भारतीय संघाला सुमारे २७ कोटी ४८ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर उपविजेता ठरलेल्या न्यूझीलंड संघाला जवळपास १४ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.
भारतीय संघाचा वर्ल्ड कपमधील संपूर्ण प्रवास
- सलामीच्या लढतीत भारताने अमेरिकेवर २९ धावांनी मात केली. मात्र, या विजयात फारशी सफाई नव्हती.
- दुसऱ्या सामन्यात नामिबियावर विजय मिळवला.
- पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवत भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला.
- चौथ्या लढतीत नेदरलँड्सवर १७ धावांनी मात केली.
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र भारताचा डाव १११ धावांत आटोपला.
- त्यानंतर झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय मिळवला.
- वेस्ट इंडिजला पाच विकेटनी नमवत भारताने पुढील फेरी गाठली.
- इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत भारताने सात धावांनी विजय मिळवला.
- अंतिम फेरीत सांघिक खेळाच्या जोरावर न्यूझीलंडला पराभूत करत भारताने इतिहास रचला.

विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत भारताने आयसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप, २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, तसेच महिला आणि युवा संघांनीही वर्ल्ड कप जिंकत भारतीय क्रिकेटचा दबदबा कायम ठेवला आहे.
