सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल हिने व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतल्याची अधिकृत माहिती दिली आहे. दीर्घकाळ चालू असलेल्या गुडघ्याच्या गंभीर समस्येमुळे आता सर्वोच्च पातळीवर खेळणे शक्य नसल्याचे तिने स्पष्ट केले. सायनाने शेवटचा सामना २०२३ मध्ये सिंगापूर ओपन स्पर्धेत खेळला होता. विशेष म्हणजे, सायनाने कोणतीही औपचारिक निवृत्ती घोषणा न करता हळूहळू स्पर्धात्मक खेळापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. एका पॉडकास्टमध्ये बोलताना ती म्हणाली, “मी दोन वर्षांपूर्वीच खेळणे थांबवले होते. मी माझ्या नियमांनुसार खेळले आणि माझ्याच नियमांनुसार थांबले. त्यामुळे मोठी घोषणा करावी असे मला वाटले नाही.”

सायनाच्या म्हणण्यानुसार, तिच्या गुडघ्यांमधील कार्टिलेज पूर्णपणे झिजली असून तिला आर्थरायटिसचा त्रास आहे. पूर्वी दिवसातून ८ ते ९ तास सराव करणारी सायना आता अवघ्या १–२ तासांतच गुडघ्याला सूज येत असल्याने पुढील सराव करू शकत नव्हती. “जेव्हा शरीर साथ देत नाही, तेव्हा तिथेच थांबणे योग्य असते,” असे तिने स्पष्टपणे सांगितले. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकदरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर सायनाचे करिअर मोठ्या आव्हानात सापडले. तरीही तिने हार न मानता २०१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक आणि २०१८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून दमदार पुनरागमन केले. मात्र, गुडघ्याची समस्या वारंवार डोके वर काढत राहिली.

सायना नेहवाल ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची पहिली महिला बॅडमिंटनपटू आहे. तिने लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये कांस्यपदक पटकावले होते. 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सायनाने २०१० आणि २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. २००९ मध्ये BWF सुपर सिरीज जिंकणारी पहिली भारतीय ठरलेल्या सायनाला अर्जुन पुरस्कार (२००९) आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१०) यांनी सन्मानित करण्यात आले. तिची निवृत्ती भारतीय बॅडमिंटनसाठी एक युग संपल्यासारखी असली, तरी तिचे योगदान कायम प्रेरणादायी राहील.

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बजेट 2026: शाळेत आता ‘लाईक, शेअर आणि सबस्क्राईब’चे धडे; अर्थसंकल्पात मोठी घोषणा!

2026-2027 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक अत्यंत नाविन्यपूर्ण…

महाराष्ट्राला धक्का: अजित पवार यांचं चार्टर्ड विमान कोसळलं; पाच जणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी बुधवारचा दिवस काळा दिवस ठरला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित…

भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळायला बांगलादेशचा नकार, आयसीसीचा BCB ला कडक इशारा…

फेब्रवारी मध्ये येणाऱ्या 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या मोठा वाद निर्माण झाला…