महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ होऊन तब्बल तीन महिने उलटले, तरी अजूनही अंतिम निकाल जाहीर झालेला नाही.
९ नोव्हेंबर २०२५ रोजी ही परीक्षा झाली. त्यानंतर १३ नोव्हेंबरला पहिलं उत्तरपत्रक (Answer key) आणि २ जानेवारी २०२६ रोजी सुधारित उत्तरपत्रक (Final Answer key) जाहीर करण्यात आलं. मात्र त्यानंतर निकालाबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. या विलंबामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नियोजन पूर्णपणे बिघडले आहे. अनेक जण पुढील टप्प्याच्या तयारीत अडकले आहेत, तर काही जण मानसिक तणावाखाली आहेत.

दरम्यान, राज्यसेवा मुख्य परीक्षा २९ मार्च २०२६ पासून होणार आहे. जर निकाल उशिरा लागला, तर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या हाती अभ्यासासाठी अत्यंत कमी दिवस उरणार आहेत. मुख्य परीक्षा ही सविस्तर लेखी स्वरूपाची असल्यामुळे तिची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ आवश्यक असतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत चालली आहे. सोशल मीडियावरून अनेक जण आयोगाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, ज्यामुळे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने निकाल जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत होणारा विलंब नेमका का, याचे स्पष्ट उत्तर आयोगाकडून मिळणे आवश्यक आहे. अन्यथा स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात अनिश्चिततेचे सावट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.
