IPL 2026 आधी Board of Control for Cricket in India म्हणजेच BCCIने एक मोठा निर्णय घेतला आहे, आणि यावेळी “नियम म्हणजे नियम” हीच भूमिका स्पष्ट दिसतेय. आयपीएलच्या 19 व्या मोसमाची सुरुवात 28 मार्चपासून होणार असून, स्पर्धा जवळ येत असताना चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण याच वेळी काही नवे नियम खेळाडूंना थोडासा झटका देणारे ठरू शकतात.

यंदाच्या नियमावलीत सर्वात जास्त चर्चा होतेय ती खेळाडूंच्या कुटुंबियांवर घालण्यात आलेल्या मर्यादांची. सरावाच्या दिवशी खेळाडूंना फ्रँचायझीच्या बसनेच स्टेडियमला जावं लागणार आहे, आणि या प्रवासात कुटुंबियांना सोबत नेता येणार नाही. तसेच सराव सत्रादरम्यान कुटुंबियांना मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही. मात्र त्यांना हॉस्पिटॅलिटी एरियातून सामने पाहण्याची मुभा असेल. म्हणजेच, या वेळेस खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये थोडं अंतर ठेवण्यावर भर दिला जातोय.
फक्त कुटुंबियांपुरतेच नाही, तर सराव सत्रांबाबतही BCCIने कडक भूमिका घेतली आहे. सामन्याच्या दिवशी कोणत्याही संघाला सराव करता येणार नाही, तसेच खेळपट्टीजवळ फिटनेस टेस्ट घेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे संघांना आधीच आपली तयारी पूर्ण करून मैदानात उतरावं लागणार आहे.

याशिवाय, ऑरेंज आणि पर्पल कॅपसंदर्भातही एक वेगळा नियम लागू करण्यात आला आहे. ज्या खेळाडूकडे ही कॅप असेल, त्याला सामन्याच्या सुरुवातीच्या दोन ओव्हर्समध्ये ती घालणं बंधनकारक असेल. त्यामुळे प्रेक्षकांना “स्टार परफॉर्मर” लगेच ओळखता येणार आहे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठीही ड्रेस कोड निश्चित करण्यात आला असून, गोल टोपी किंवा स्लीवलेस जर्सी घालून हजर राहता येणार नाही.
महत्त्वाचं म्हणजे, नियमांचं उल्लंघन केल्यास सुरुवातीला सूचना दिली जाईल, पण तीच चूक पुन्हा केल्यास थेट दंडात्मक कारवाई होणार आहे. एकंदरीत, या सगळ्या नियमांमधून BCCIचा डिसिप्लिन आणि प्रोफेशनलिझमवरचा भर स्पष्ट दिसतोय.
