देशभरात NEET परीक्षेवरून सुरू असलेल्या चर्चेच्या आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर तमिळगा व्हेट्री कळघम (TVK) पक्षाने केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. NEET परीक्षेतील केवळ गैरप्रकार आणि अनियमितता रोखून प्रश्न सुटणार नाही, तर ही राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा कायमची रद्द करण्यात यावी, अशी ठाम भूमिका पक्षाने मांडली आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि TVK चे अध्यक्ष जोसेफ विजय यांच्या पक्षाने वैद्यकीय शिक्षणासह शिक्षण क्षेत्रातील निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारकडून काढून राज्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी केली आहे. यासाठी शिक्षण हा विषय राज्यघटनेतील समवर्ती सूचीमधून काढून पुन्हा राज्य सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, असा प्रस्ताव पक्षाने मांडला आहे.
मात्र, हे तातडीने शक्य नसल्यास तात्पुरता उपाय म्हणून ‘विशेष समवर्ती सूची’ तयार करण्यात यावी आणि त्याद्वारे शिक्षण व वैद्यकीय शिक्षणासंदर्भात राज्यांना अधिक अधिकार देण्यात यावेत, अशी मागणीही TVK ने केली आहे.
दरम्यान, आपल्या पत्रकातून TVK ने विरोधकांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. “सत्तेत आल्यानंतर NEET रद्द करू”, अशी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणारे राजकारण आम्ही करणार नाही, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.
याचदरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या NEET विरोधी आंदोलनाला आणखी एक वळण मिळाले आहे. CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या मागण्यांमध्ये आणखी एका मागणीची भर घातली आहे. २० जुलैच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांवर कोणतेही गुन्हे दाखल करू नयेत किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू नये, अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे.
आता NEET परीक्षा रद्द करण्याच्या या मागणीवर केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

