नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरु करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी हालचाल सुरू झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टॉर्मर यांनी सुमारे 30 ते 35 देशांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असून, या बैठकीसाठी भारतालाही निमंत्रण देण्यात आले आहे.

अमेरिका–इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणावर तेल व गॅस वाहतूक होते. मात्र, इराणने या मार्गावर नियंत्रण आणल्याने ऊर्जा संकट तीव्र झालं आहे.
या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत ऊर्जा पुरवठा पूर्ववत करणे आणि समुद्री वाहतूक सुरक्षित करणे हा मुख्य उद्देश असणार आहे. भारताकडून परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हे या बैठकीत ऑनलाईन सहभागी होणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.
दरम्यान, संघर्षग्रस्त भागात सुमारे 1 कोटी भारतीय नागरिक राहत असून ते सुरक्षित असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. भारतीय दूतावास त्यांच्याशी सातत्याने संपर्कात असल्याचंही सांगण्यात आलं. तथापि, या संघर्षात आतापर्यंत 8 भारतीयांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे.

दुसरीकडे, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी या प्रश्नावर लष्करी कारवाईला विरोध दर्शवला आहे. होर्मुझ मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी इराणसोबत संवाद आणि समन्वय हाच एकमेव मार्ग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
एकूणच, होर्मुझ संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला असून, या बैठकीतून काही ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
