सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. आई-वडील हे मुलांसाठी देवासमान मानले जातात, मात्र इथे जन्मदात्यानेच आपल्या लेकरांसोबत क्रूरतेची परिसीमा गाठली. बनपुरी गावात दादू यमगर नावाच्या इसमाने आपल्या 10 आणि 13 वर्षांच्या दोन मुलींना चोरीच्या संशयावरून रात्रभर घरात खुंटीला उलटे टांगून ठेवले. या निर्दयी शिक्षेमुळे एका मुलीचा तडफडून मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने या मुलींवर चोरीचा संशय व्यक्त केला होता. या आरोपामुळे संतापलेल्या वडिलांनी कोणतीही चौकशी न करता थेट मुलींनाच शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही शिक्षा इतकी भयानक होती की, रात्रभर मुली पाणी मागत असतानाही त्यांना एक थेंबही मिळाला नाही, परिणामी एका निरपराध मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी दादू यमगर यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या घटनेची अधिकृत तक्रार नोंदवली गेली नव्हती. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी स्वतःहून कारवाई सुरू केली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे.
