मी सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की… हे वाक्य आज महाराष्ट्राला ऐकायला मिळालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सलग ६ वेळा उपमुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीनंतर आता त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या इतिहासातल्या त्या पहिल्या उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला. पक्षाने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत लोकभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव तसेच राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते. कोणताही मोठा सोहळा न करता, अत्यंत शांत आणि औपचारिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. अनेकांच्या मनात आज हि एक शंका आहे कि सुनेत्रा पवार या पदासाठी योग्य आहेत का? पण अनेकजण हे विसरतात कि हे काही एका रात्रीत घडलेलं नाही. अजितदादांच्या राजकारणाची सुरुवात आणि अख्खी हयात सुनेत्रा वहिनींनी जवळून पाहिलीय. सुनेत्रा पवार राजकारणात आल्या त्या अजित पवार यांच्यामुळेच. आणि या राजकारणाला सुरुवात झाली ती सामाजिक कार्यातूनच.. बघुयात सुनेत्रा पवार यांचा सामाजिक आणि प्रवास.

महिला बचत गट चळवळीपासून त्यांचा हा प्रवास सुरू झाला. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांना कर्जपुरवठा, प्रशिक्षण आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.सहकार क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विविध सहकारी संस्था, बँका आणि महिला संघटनांमध्ये त्या पदाधिकारी म्हणून कार्यरत राहिल्या. अनेक ठिकाणी त्या अध्यक्ष, संचालक किंवा मार्गदर्शक म्हणून काम करत राहिल्या. २०१० मध्ये, त्यांनी ‘एनव्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’ (EFOI) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली, जी सेंद्रिय शेती, पर्यावरणपूरक गावे आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.
२०११ पासून त्या फ्रान्समधील वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरमच्या थिंक टँकच्या सदस्या आहेत शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या त्या विश्वस्त म्हणूनही काम करतात. २०१७ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणूनही आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी म्हणून ओळख असली, तरी अशा विविध कार्यातून त्यांची स्वतःची एक स्वतंत्र सामाजिक ओळख निर्माण केली. २०२४ मध्ये सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून संसदीय राजकारणात प्रवेश केला. त्या सामाजिक कार्यकर्ती म्हणून न राहता, राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या नेत्या म्हणून अधिक व्यापक झाली. मूळच्या धाराशिवच्या असणाऱ्या सुनेत्रा या स्वातंत्र्यसैनिक बाजीराव पाटील यांची त्या कन्या आणि माजी राज्यमंत्री आणि लोकसभा खासदार पद्मसिंह पाटील यांची बहिण. त्यांचं शिक्षण छत्रपती संभाजीनगरच्या एसीबी कॉलेज मधून पूर्ण झालं. १९८५ साली त्या अजित पवार यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. बी.कॉम. पदवी असूनही, त्यांनी बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क या मोठ्या औद्योगिक उपक्रमाचे नेतृत्व केलं, आणि एक व्यावसायिक उद्योजक बनल्या. सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव असल्याने येत्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अधिक प्रभावी ठरेल, अशी आशा करुयात.
