केंद्र सरकारचा अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. निर्मला सीतारामन यावेळी आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेतआणि असं करणाऱ्या त्या देशाच्या इतिहासातील दुसऱ्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत, ज्यांना अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली आहे. याआधी हा मान माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मिळाला होता. इंदिरा गांधी यांनी 1970 साली देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता.

1969 हे वर्ष भारतीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरलं. त्या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, तर मोरारजी देसाई हे अर्थमंत्री होते. मात्र काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे मोरारजी देसाई यांना पक्षातून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे वित्तमंत्रीपद रिक्त झालं. काही महिन्यांतच अर्थसंकल्प सादर करायचा असल्याने सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. अशा परिस्थितीत इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वतःकडे घेतला. 28 फेब्रुवारी 1970 रोजी त्यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडत इतिहास घडवला. त्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या.

इंदिरा गांधी यांच्यानंतर तब्बल अनेक दशकांनी निर्मला सीतारामन यांना अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. त्यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर दरवर्षी त्यांनी अर्थसंकल्प मांडत महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतले आहेत. अर्थमंत्री म्हणून त्यांचा ठसा अर्थ मंत्रालयावर स्पष्टपणे उमटलेला दिसतो. विशेष म्हणजे निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्रीही राहिल्या आहेत.
