महाराष्ट्राच्या राजकारणासाठी बुधवारचा दिवस काळा दिवस ठरला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचं चार्टर्ड विमान बारामती विमानतळाजवळ भीषण अपघातात कोसळलं. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक वर्तुळात सर्वांनाच तीव्र धक्का बसला आहे.
अपघातग्रस्त विमान हे दिल्लीस्थित VSR Ventures Pvt Ltd या खासगी एव्हिएशन कंपनीचं Learjet 45 प्रकारचं एअरक्राफ्ट होतं. या विमानाचा नोंदणी क्रमांक VT-SSK असून त्याचं एकूण वजन सुमारे 9,752 किलोग्रॅम होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे, या कंपनीच्या एका विमानाचा 14 सप्टेंबर 2023 रोजीही मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. VSR Ventures Pvt Ltd ही 2011 मध्ये स्थापन झालेली कंपनी असून चार्टर विमान सेवा आणि एव्हिएशन कन्सल्टन्सी क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीचे मालक कॅप्टन विजय सिंग आणि कॅप्टन रोहित सिंग असल्याची माहिती आहे.
हे विमान सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झालं होतं. अजित पवार बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार मोठ्या जाहीर सभा घेणार होते. त्यामुळे सकाळपासूनच त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र लँडिंगच्या वेळी विमानाला तांत्रिक अडचण आल्याचं प्राथमिक तपासात समोर येत असून, विमान रनवेवर उतरण्याऐवजी जवळच्या शेतजमिनीत कोसळलं. जमिनीवर आदळताच विमानाचे तुकडे झाले आणि भीषण आग लागली.
विमानाची कमान अनुभवी पायलट कॅप्टन साहिल मदान आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांच्या हातात होती. कॅप्टन साहिल मदान हे 2010 पासून कमर्शियल विमान उडवत होते आणि त्यांच्या कारकिर्दीला 16 वर्षांचा अनुभव होता. त्यांनी विविध नामांकित चार्टर एव्हिएशन कंपन्यांसोबत काम केलं होतं. फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक 2022 पासून VSR Ventures सोबत कार्यरत होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एव्हिएशनचं शिक्षण घेतलं होतं आणि 2018 ते 2019 दरम्यान न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकादमीत प्रशिक्षण घेतलं होतं.
या विमानात अजित पवार यांच्यासोबत फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी आणि त्यांचे पीएसओ हेड कॉन्स्टेबल विदित जाधव यांचाही समावेश होता. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) यांनी या अपघातात पाचही जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली असून, अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून राज्यभर शोक व्यक्त केला जात आहे.
