शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज १०० वी जयंती आहे. मराठी अस्मिता, राजकारण आणि निर्भीड नेतृत्व यासाठी ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे हे फक्त राजकीय नेते नव्हते, तर अनेक कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक आणि कला क्षेत्रातल्या मंडळींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी असलेलं त्यांचं नातं अतिशय खास मानलं जायचं. बाळासाहेब आणि अमिताभ यांचं हे नातं फक्त मैत्रीपुरतं मर्यादित नव्हतं, तर एका कठीण क्षणी बाळासाहेब ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांना अक्षरशः जीवनदान दिलं होतं. हा प्रसंग स्वतः अमिताभ बच्चन यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितला आहे.

गोष्ट आहे १९८२ सालची. ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा ऍक्शन सीन शूट करताना गंभीर अपघात झाला होता. या अॅक्शन सीनदरम्यान ते लाकडाच्या पृष्ठभागाला जोरात आदळले, अभिनेता पुनीत इस्सर याने मारलेला ठोसा त्यांना पोटात जोरात लागला आणि त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. परिस्थिती इतकी गंभीर होती की त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणं अत्यावश्यक होतं. मात्र, त्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस होता आणि रस्ते बंद असल्यामुळे मदत पोहोचणं कठीण झालं होतं. अशा वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला आणि शिवसेनेची अँब्युलन्स लवकरात लवकर पाठवण्याचे आदेश दिले. त्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे अमिताभ बच्चन यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात यश आलं आणि त्यांचा जीव वाचला.
या घटनेचा उल्लेख करताना अमिताभ बच्चन यांनी अनेकदा स्पष्टपणे सांगितलं आहे की, “ज्या क्षणी माझ्या आयुष्याचा शेवट होईल असं वाटत होतं, त्या क्षणी बाळासाहेब ठाकरे माझ्या मदतीला धावून आले. त्यांच्यामुळेच आज मी जिवंत आहे.” यानंतर दोघांमधलं मैत्रीचं नातं जास्त घट्ट झालं. अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नानंतर बाळासाहेबांनी त्यांना स्वतःच्या घरात कुटुंबीयांसारखं स्वागत केलं. त्या दिवसापासून ठाकरे कुटुंब आणि बच्चन कुटुंब यांचं नातं केवळ मैत्रीचं न राहता, आपुलकीचं आणि विश्वासाचं बनलं.
बाळासाहेब ठाकरे यांचं हे व्यक्तिमत्त्व. मदतीला धावून जाणारं, नात्यांना जपणारं आणि सर्वांसाठी निर्भीडपणे उभं राहणारं आज त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त पुन्हा एकदा आठवण करून देतं की, ते केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर माणुसकी जपणारे एक मोठे व्यक्तिमत्त्व होते.
