ही गोष्ट आहे भारतीय इतिहासातल्या एका अशा नायकाची, ज्याच्या शौर्याची तुलना थेट फ्रान्सच्या नेपोलियन बोनापार्टशी केली जाते. ज्याने एकाकी असतानाही ब्रिटीश सत्तेला सळो की पळो करून सोडलं. कोण होता तो यौद्धा? चला पाहुयात.
ते होते होळकर साम्राज्याचे महान शासक, दूरदृष्टीचे राजकारणी आणि ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे झुंजार सेनानी — महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम). त्यांचा जन्म ३ डिसेंबर १७७६ रोजी पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथे झाला. त्यांचे वडील सुभेदार तुकोजीराव होळकर (प्रथम) होते.
अहिल्याबाई होळकर यांच्या मृत्यूनंतर होळकर घराण्याचा वारसा तुकोजीरावांकडे आला. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर घराण्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. ते वर्ष होतं १७९७. यशवंतराव होळकर यांचे थोरले बंधू विठोजी होळकर यांना पुणे शहरात पेशव्यांनी क्रूरपणे हत्तीच्या पायी तुडवून ठार मारण्यात आलं.
हा केवळ राजकीय खून नव्हता, तर होळकर कुटुंबावर झालेला मोठा आघात होता. अत्यंत तरुण असलेल्या यशवंतरावांच्या मनात या घटनेने सूडाची आग पेटवली. मराठा साम्राज्यातील अन्याय, अंतर्गत कलह आणि ब्रिटीशांची वाढती घुसखोरी पाहून त्यांनी त्याच क्षणी एक शपथ घेतली —
“या अन्यायी पेशवाईला आणि मराठा सत्तेचा फायदा घेऊ पाहणाऱ्या इंग्रजांना मी धडा शिकवणार!”
यानंतर यशवंतराव एकाकी झुंज देणारा, स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवणारा लढवय्या बनला. त्यांच्या जवळ ना मोठी फौज होती, ना राज्याचा पाठिंबा. त्यांच्यावर सतत हल्ले झाले, जंगलात भटकंती करावी लागली, पण या एकाकीपणात त्यांच्या मनात एकच गोष्ट ठाम होती — स्वकर्तृत्वावर विश्वास!
अत्यंत कुशलतेने आणि मुत्सद्देगिरीने त्यांनी स्वतःच्या हिमतीवर २०,००० सैनिकांची फौज उभी केली. या फौजेत रोहिले, पिंडारी आणि इतर समविचारी योद्धे सामील होते. यशवंतराव आपल्या सैन्याची इतकी काळजी घेत की सैनिक त्यांना ‘अन्नदाता’ मानत. याच फौजेसोबत त्यांनी सूड आणि मराठा साम्राज्य वाचवण्याचे मिशन सुरू केलं.

यानंतर त्यांनी थेट पेशव्यांनाच आव्हान देण्याचं ठरवलं. वर्ष होतं १८०२, ऐन दिवाळीचा काळ. पुण्यात आनंदाचं वातावरण होतं, पण यशवंतराव आपल्या ‘वाघांच्या’ फौजेसह पुण्याच्या दिशेने कूच करत होते.
एका बाजूला पेशवा बाजीराव (दुसरा) आणि दौलतराव शिंदे यांची अवाढव्य, प्रशिक्षित फौज होती, तर दुसऱ्या बाजूला यशवंतरावांची छोटी पण अत्यंत चपळ आणि धोकादायक सेना होती. हडपसरच्या मैदानात झालेलं हे युद्ध मराठा इतिहासातील अत्यंत निर्णायक युद्ध ठरलं.
यशवंतरावांनी स्वतः पुढे राहून नेतृत्व केलं. त्यांचा तोफखाना आणि घोडदळ इतक्या वेगाने हल्ला करत होतं की शिंदे आणि पेशव्यांना काही कळायच्या आतच त्यांची फौज पराभूत झाली. पेशवा बाजीराव (दुसरा) इतका घाबरला की तो रात्रीच्या अंधारात पुण्यातून पळून गेला.
हा पळपुटेपणा केवळ एका राजाचा पराभव नव्हता, तर मराठा साम्राज्याचा स्वाभिमान गमावण्याचा क्षण होता. बाजीराव थेट इंग्रजांच्या आश्रयाला गेला आणि त्याने वसईचा लाजिरवाणा तह केला. या तहामुळे इंग्रजांना मराठा राजकारणात घुसण्याचा कायदेशीर परवाना मिळाला.
या घटनेसाठी काहीजण यशवंतरावांना जबाबदार धरतात, पण त्यांचा मूळ उद्देश मराठा साम्राज्याला अंतर्गत अन्यायातून मुक्त करणं हाच होता.
१८०३ ते १८०५ हा काळ म्हणजे यशवंतराव होळकर विरुद्ध ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील संघर्षाचा सुवर्णकाळ होता. या काळात यशवंतरावांनी इंग्रजांविरुद्ध एकूण १८ लढाया केल्या आणि विशेष म्हणजे प्रत्येक लढाईत इंग्रजांचा पराभव केला.
ज्या काळात संपूर्ण भारत ब्रिटीश सत्तेपुढे झुकत होता, त्या काळात यशवंतराव एकमेव असे शासक होते ज्यांनी इंग्रजांना सातत्याने आणि निर्णायक पराभव दिला. नेपोलियन बोनापार्टप्रमाणेच त्यांची युद्धनीती गतिमान, अप्रत्याशित आणि आक्रमक होती.
१८०४ मध्ये त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्याला वेढा दिला. इंग्रजांचा सेनापती जनरल लॉर्ड लेक याला त्यांनी अक्षरशः हैराण करून सोडलं. सततच्या पराभवांमुळे अखेरीस इंग्रजांना १८०५ मध्ये राजघाटचा तह करावा लागला.
हा तह ऐतिहासिक ठरला, कारण इंग्रजांनी यशवंतरावांनी सांगितलेल्या अटींवर तो स्वीकारला. या तहानंतरही होळकर राज्य स्वतंत्र आणि सार्वभौम राहिलं. इंग्रजांना त्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करता आला नाही.
२८ ऑक्टोबर १८११ रोजी या महान योद्ध्याचं निधन झालं. अल्प आयुष्यात त्यांनी सिद्ध केलं की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य नेतृत्व आणि अदम्य इच्छाशक्ती असेल, तर कोणतीही महाशक्ती आपल्यावर राज्य करू शकत नाही.
