‘दादा’ ही फक्त हाक नव्हती, तो एक आधार होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही, तर हजारो कार्यकर्त्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामतीत त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी उसळलेला जनसागर आणि अश्रूंनी भरलेले डोळे दादांवरील प्रेम सांगून जात होते. राज्याच्या राजकारणात एक युग संपल्याची भावना अजूनही ताजी असतानाच, त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या भावनिक वातावरणातच पक्षासमोर पुढील नेतृत्व, जबाबदाऱ्या आणि सत्तेतील भूमिकेचा प्रश्न उभा राहिलाय. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचालींची चर्चा सुरू असून वेगवेगळे तर्क-वितर्क मांडले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केल्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे, पवार कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी आणि त्यांच्या निर्णयक्षमतेकडे पाहता, कोणताही निर्णय हा भावनेपेक्षा राजकीय व्यवहार्यता आणि दीर्घकालीन रणनीती लक्षात घेऊनच घेतला जातो, असा समज आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा ही केवळ पदापुरती नसून, पक्षातील नेतृत्वाच्या स्थैर्याशी जोडली जात असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
दरम्यान, काही राजकीय विश्लेषकांच्या मते, पक्षात तरुण नेतृत्व पुढे आणण्याच्या दृष्टीने पार्थ पवार आणि जय पवार यांच्याबाबतही चर्चा सुरू आहे.
येत्या काही दिवसांत पक्षांतर्गत बैठकांमधून या विषयावर स्पष्टता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरी हे सर्व राजकीय चर्चेपुरते मर्यादित असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
